भाजपा तालुकाध्यक्षांसह कार्यकर्ते, ग्रामस्थांची आचरा पोलीस ठाण्याला धडक
आचऱ्यात बांगलादेशींचे वास्तव्य, कारवाईबाबत विचारला जाब, आचरा पोलिसासांना दिले निवेदन
आचरा । प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात आचरा पोलिस कार्यक्षेत्रात सातत्याने भर दिवसा चोऱ्यांचे प्रकार घडत असून कोणत्याही चोरीचा छडा लागलेला नाही. चोरटे मोकाट असून आचरा कार्यक्षेत्रातील लोकांची प्रचंड नाराजी आहे. महिला दहशतीखाली घरात राहू लागल्या आहेत. बांगलादेशी, फेरीवाले यांचा सुळसुळाट झाला आहे. आचरा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसून येत्या महिन्याभारत झालेल्या चोऱ्यांचा छडा लावा अन्यथा महिन्याभराने आचरा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणणार असल्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा पोलीस ठाण्यात धडक देत भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी यांनी दिला
यावेळी आचरा पोलीस ठाण्याचा चार्ज असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मालवण तालुका भाजपा अध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण सोसायटी चेअरमन राजन गांवकर, राजन पांगे, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, वायंगणी माजी सरपंच हनुमंत प्रभू, चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, देवेंद्र हडकर, मनोज हडकर सिद्धार्थ कोळगे, बाळू वस्त, समीर बावकर, बंटी भोवर, अमित गांवकर, वायंगणी ग्रामपंचायत सदस्या मालती जोशी, चंदू सावंत, भाई घाडीगांवकर, मनोज वराडकर, कृष्णा घागरे, ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवारी वायंगणी येथील वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सुमारे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरटयांनी दुचाकीवरून येत लंपास केले होते. अशाच प्रकारच्या घटना आचरा भागात वर्षभरात घडून एकही चोरीचा तपास न लागल्याने आज अखेर आचरा पोलिसांना जाब विचारण्यासाठी धडक दिली.
आचरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले वर्षभर दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत. आता पर्यंत पोलिसांनी काय तपास केला. पोलीस का चोरट्यांना शोधू शकले नाहीत. आपण काय तपास केला याची माहिती द्या. अशी मागणी धोंडी चिंदरकर यांनी लावून धरली होती. चोर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आणखी राहणार आहे. ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण दूर व्हावे, पोलिसांचा मान राखला जावा यासाठी तपासाला अधिकाअधिक गती मिळाली पाहिजे. आचरा पोलिसांच्या हद्दीत चोऱ्या होत आहेत. पोलीस गुन्हे नोंदवत आहेत. ठाण्याचे अधिकारी बदलत आहेत तपास मात्र जैसे थे अडकून पडला आहे अशी स्थिती झाली असल्याचे यावेळी चिंदरकर म्हणाले.
आचऱ्यात बांगलादेशींचे वास्तव्य, कारवाई कधी करणार
आचरा गावात मोठया प्रमाणात बांगलादेशी वास्तव्य करून आहेत. दिवसा ढवळ्या फिरत आहेत. मशीदींच्या बाजूला अनोळखी व्यक्ती फिरत आहेत. त्यांचे वास्तव्यही दिसत आहे. याबाबत पोलिसांचे लक्ष वेधले असता आपण तक्रार द्या मग कारवाई करतो असे पोलिसांकडून सांगितले जाते. असा आरोप राजन गावकर यांनी यावेळी केला. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशीवर आपण कारवाई केव्हा करणार, फेरीवाल्याना केव्हा रोखणार याचे उत्तर देण्याची मागणी गावकर यांनी केली. आज या भागातील जागामालक बेकायदेशीर अशा लोकांना राहण्यासाठी जागा देत आहेत अशा जागा मालकांना नोटीसा बजावून त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात केली.
आचरा पोलीस वाळू, मटक्यापुरते ग्रामस्थांमध्ये प्रतिमा
आचरा तिठ्यावरून राजरोस वाळू वाहतूक सुरु आहे. मटक्यासारखे बेकायदेशीर धंदे चालू आहेत. चोऱ्या मोठया प्रमाणात होत आहेत. आचरा पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे होते. मात्र आचरा पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आचरा पोलीस हे फक्त वाळू
डंपर आणि मटक्याचे हप्ते घेण्यापुरते मर्यादित आहेत अशी प्रतिमा ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली असल्याची टीका यावेळी राजन गावकर यांनी केली.
आचरा पोलीस ठाण्याकडून तपास चालू
आचरा व पंचक्रोशीतील झालेल्या चोऱ्यांचा तपास चालू आहे. शक्य तितके अंदाज पडताळून पाहिले जात आहेत, सीसीटीव्ही फुटेज घेतली जात आहेत. तपास कोठेही थांबलेला नाही. पोलीस चोरांच्या मागावर आहेत. लवकरच चोऱ्यांचा छडा लावण्यात यशस्वी होतील असा विश्वास आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी व्यक्त केला.









