बेळगाव-पणजी जादा बससेवा सुरू करण्याची गरज
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी, तसेच बेळगाव-चोर्ला-पणजी जादा जलद बससेवा सुरू करावी, अशी मागणी जांबोटी, कुसमळी, उचवडे परिसरातील नागरिकांमधून व विद्यार्थीवर्गातून होत आहे. जांबोटी, कुसमळी, उचवडे,सोनारवाडी तसेच किणये आदी गावांतून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी व नागरिक व्यवसाय, नोकरी बाजारहाट तसेच इतर कामांसाठी पिरनवाडी, उद्यमबाग व बेळगाव या ठिकाणी नियमितपणे ये-जा करतात. मात्र या मार्गावर अपुरी बससेवा असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशीवर्गांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी बेळगाव-जांबोटी व्हाया चोर्ला-पणजी अशा बऱ्याच जलद तसेच लांबपल्ल्याच्या बसेस या मार्गाने नियमित ये-जा करत होत्या.
मात्र सध्या या मार्गावरील कर्नाटक तसेच कदंब परिवहन महामंडळाच्या अनेक जलद व लांबपल्ल्याच्या बसगाड्या खराब रस्त्याची सबब पुढे करून बंद केल्या आहेत. शिवाय अनेक बसेसचे वेळापत्रकही कोलमडले असल्याने, प्रवाशी व विद्यार्थी वर्गांचे बरेच हाल होत आहेत. दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत जांबोटीहून बेळगावकडे जाणारी एकही जलद अथवा स्थानिक बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवासी वर्गांना जांबोटी बसस्थानकावर तासन्तास बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. तसेच या मार्गावरील जलद बसेसना कुसमळी, उचवडे, किणये आदी गावांमध्ये बस थांबा उपलब्ध नसल्यामुळे या गाड्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुचकामी ठरल्या आहेत. गोव्याला जाणाऱ्या सर्व जलद बसगाड्या केवळ बेळगाव, पिरनवाडी, जांबोटी याच ठिकाणी थांबून प्रवाशी घेत असल्यामुळे, कुसमळी, उचवडे, किणये येथून बेळगाव अथवा पिरनवाडी या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी बसेसना बसस्थानकावर थांबा घेण्याचा आदेश देण्याची मागणी होत आहे.









