ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे त्यांनी आश्वासन दिले. दरम्यान, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंचाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 52 लोकांचा बळी गेला आहे. अशा भीषण परिस्थितीत महाराष्ट्रातील आयआयटी आणि एनआयटीमध्ये शिकणारे काही विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. अशा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.








