ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात देशव्यापी अभियान राबवावे, असे आवाहन राष्ट्रीय मराठी मोर्चाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी रविवारी केले. सोमय्यांनी हे अभियान राबवले तर राष्ट्रीय मराठी मोर्चा त्यांना देशभरातून जाहीर समर्थन देईल, असे रेखी यांनी म्हटले आहे.
रेखी म्हणाले, राज्यातील अनेक नेते, माजी मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सोमय्या यांनी ‘भ्रष्टाचारमुक्त लोकप्रतिनिधी’च्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. दररोज नवनवीन घोटाळे बाहेर काढत सोमय्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावले आहे. विरोधक सोमय्यांमुळे पुरते हैराण झाले आहेत. सोमय्यांनी आता राज्यातील भ्रष्टाचारासह वाढती गुन्हेगारी, महिलांविरोधातील अत्याचार, भुमाफिया तसेच इतर कुप्रवृत्तीला ठेचण्यासाठी सोमय्या यांनी पुढाकार घ्यावा.
भाजपेतर राज्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे कर्तृत्ववान सरकार सत्तेत आहे. सरकारचा प्रशासनावर उत्तम पकड आहे. नवीन सरकार सत्तेत येताच राज्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.








