दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी 16 तास निर्धारित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात चालविलेल्या ‘सिंदूर अभियाना’संबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विस्तृत चर्चा केली जाणार आहे. या चर्चेचा कार्यक्रम अधिकृतरित्या घोषित करण्यात आला आहे. लोकसभेत ही चर्चा सोमवार, 28 जुलै या दिवशी, तर राज्यसभेत मंगळवार, 29 जुलै या दिवशी होईल. दोन्ही सभागृहांमध्ये या चर्चेसाठी प्रत्येकी 16 तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
बुधवारी संसदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते चर्चेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच मुद्द्यावर संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाचे आतापर्यंतच दिवस वाया गेले आहेत. विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळ माजविल्याने कामकाज स्थगित करावे लागले आहे. आता चर्चा कार्यक्रम निश्चित झाल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चेत दोन्ही बाजू एकमेकांवर कुरघोडी करून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करण्याचीही शक्यता आहे.
विरोधकांचे आरोप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपणच थांबविला, असे प्रतिपादन आतापर्यंत 25 हून अधिकवेळा केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा बनविला आहे. सभागृहांमधील चर्चांमध्येही विरोधकांकडून या मुद्द्यावर जोर दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने अनेकदा ट्रम्प यांच्या विधानाचा प्रतिवाद केला असून पाकिस्तानने विनंती केल्यामुळेच आम्ही त्या देशावरील हल्ले थांबविले, असे स्पष्ट केले आहे. तसेच, ‘सिंदूर अभियान’ थांबविण्यात आलेले नाही. ते केवळ स्थगित करण्यात आलेले आहे, असेही केंद्र सरकारकडून अनेकदा प्रतिपादन करण्यात आलेले आहे.
सत्ताधाऱ्यांचा प्रतिवार
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘सिंदूर अभियान’ भारताने मिळविलेल्या देदिप्यमान यशासंबंधी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आपल्या देशाच्या सेनादलांच्या पराक्रमावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे ते संभ्रम निर्माण करणारी विधाने करीत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पाकिस्तानला बळ मिळत आहे. भारताने हे अभियान, काश्मीर प्रश्न आणि इतर संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका सातत्यपूर्ण रितीने नेहमी स्पष्ट केली आहे. तथापि, विरोधी पक्षांच्या भारताच्या व्यवस्थांवर विश्वास नसून भ्रम फैलावणाऱ्या विदेशी शक्तींना पाठबळ देण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहेत, असा पलटवार सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. संसदेत या विषयावरील चर्चेत या सर्व आरोप-प्रत्यारोपांची उजळणी होणार आहे.









