ऑनलाईन टीम/तरुण भारत
“काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवले पाहिजेत. नाहीतर श्रीलंकेत (sri lanka violence) जी स्थिती आहे तशी भारतात येईल. श्रीलंकेत जसं राज्यकर्त्यांना रस्त्यावर धरून बदडलं, राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत, त्यांच्या घरांना आगी लावल्या तशी परिस्थिती भारतात येऊ नये असं वाटत असेल तर राज्यकर्ते आणि राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नावर बोलावं,” असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मोदी सरकारला दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि नेत्यांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. आत त्यांनी मोदी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी देशात उपस्थित होणाऱ्या वादग्रस्त विषयांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशात काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवायला पाहिजेत, नाहीतर श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत. त्यांची घरे जाळलीत ती स्थिती भारतात निर्माण होईल, असा गंभीर इशारा राऊत यांनी दिला. तसेच त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरही भाष्य केलं. राम मंदिरासाठी (ram mandir) दोन्ही बाजूंनी हजारो लोकांनी प्राण गमावले आणि रक्ताचे पाट वाहिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, “अयोध्येच्या आंदोलनात दोन्ही बाजूने हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. रक्ताचे पाट वाहिले आहेत. त्यानंतर आता राम मंदिर उभं राहत आहे. राम मंदिर आमच्या सर्वांच्या अस्मितेचा विषय होता. ते उभं राहत आहे. त्यामुळे आता देशात महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे.”









