उबाठा शिवसेनेची कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे मागणी ;अन्यथा महामार्गावर जनआंदोलनाचा इशारा
कुडाळ –
माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शनिवारी कुडाळ तालुका उबाठा शिवसेना पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. माजी आमदार श्री नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल, तर झाराप येथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्याद दाखल करणारे महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा महामार्ग रोखून जनआंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. मुंबई- गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे चारदिवसापूर्वी तेथील मिडलकट कडून दुचाकी क्रॉसिंग करताना कारची जोराची धडक बसून भीषण अपघात झाला. ग्रामस्थ एकवटले आणि महामार्ग बंद केला.तसेच तेथे माजी आमदार श्री नाईक आले होते. सायंकाळी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता श्री साळुंके यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार श्री नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उबाठा शिवसेनेत तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज सकाळी शिवसेना कुडाळ तालुक्याच्यावतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन देण्यात आले. उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे , कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट ,पं. स. माजी सदस्य अतुल बंगे , युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट , एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक , कुडाळ उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी ,युवा सेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, सुशील चिंदरकर , युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, अँड सुधीर राऊळ, सचिन ठाकूर, रुपेश वाड्येकर ,बाळू पालव, मंगेश बांदेकर, रुपेश खडपकर, गुरु गडकर, स्वप्नील शिंदे, बंड्या कोरगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे,महामार्गावर झाराप- तिठा येथे चुकीच्या पद्धतीने मिडलकट ठेवण्यात आला आहे.या मिडलकटमुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला. हा मिडलकट बंद करून त्याठिकाणी सर्कल किंवा उड्डाण पूल उभारावे, अशी मागणी झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्याकडे वारंवार करण्यात आली होती. निवेदनेही दिली होती. परंतु श्री.साळुंके यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या मिडलकटमुळे मंगळवारी पुन्हा याठिकाणी अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झालातेव्हा ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक देखील याठिकाणी उपस्थित होते.त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला.यापूर्वीही श्री नाईक यांनी महामार्गावरील खड्डयांप्रश्नी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी श्री साळुंके यांनी त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप निवेदनात केला आहे. श्री साळुंके यांच्या जातीचा अपमान होईल,असे कोणतेही वक्तव्य वैभव नाईक यांनी केले नाही आम्ही त्याठिकाणी उपस्थित होतो.जर जाब विचारला म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात असेल, तर तेथे चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी श्री. साळुंके यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेच ठाकरे पक्षाच्यावतीने देण्यात आला.









