मुंबई प्रतिनिधी
मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व पत्रकार आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
1960 च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱया वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱया पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱया उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे तरूण भारत बेळगावमध्ये त्यांनी खेळाशी संबंधित विपुल लिखाण केले. याशिवाय समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्याशीही त्यांचे स्नेहसंबंध होते.
करमरकर मूळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत त्यांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली आणि ती सुद्धा क्रीडा पत्रकाराची. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठय़ा संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत प्रभावी आणि प्रवाहितपणे चालवत ठेवली.
समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला. नकली आणि सवंगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खो खो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खो खो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. खो खो संस्था, कार्यकर्ते यांना आधार दिला. परिणामी खेळ मोठा होत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळून नोकऱयांच्या संधी उपलब्ध झाल्या. बँका, रेल्वेची खो खो खेळाडूंना दारे उघडली गेली! दुसऱया बाजूला सिझन क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची असल्यास त्याचाच ध्यास घेतला पाहिजे. परिणामी टेनिस क्रिकेटला महत्त्व देता कामा नये, यामुळे युवा खेळाडूंचा वेळ, मेहनत वाया जाते. यातून हाती काही लागत नाही. म्हणून त्यांनी कधीच टेनिस क्रिकेटचा फोटो सोडाच, सिंगल बातमी सुद्धा लावली नाही.
करमरकर यांच्या प्रभावी लिखाणामुळे बुवा साळवी, श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर, बाळ वडवलीकर, रमेश वरळीकर, मंगेश भालेकर, भास्कर सावंत असे असंख्य संघटक आणि कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली. यामधून प्रेरणा घेत असंख्य कार्यकर्ते उभे राहिले. खेळांचा प्रचार प्रसार होत राहिला. परिणामी खेळांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर कायम राहिला.
पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराची करमरकर यांनी पोलखोल केली. यामुळे त्यांच्यावर सुरेश कलमाडी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पण यामुळे न डगमगता करमरकर यांची लेखणी आणखी टोकदार झाली. आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर त्यानी अनेक विविध खेळाचे धावते समालोचन केले. आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेदरम्यान दोन-तीन आठवडे त्यांचा कॉलम ‘ना खंत ना खेद’ यात अत्यन्त अभ्यासपूर्ण वेगळी मौलिक माहिती वि.वि.क. आपल्या तजेलदार शैलीत मांडत असत. अत्यंत वाचनीय असं लिखाण मराठी क्रीडाक्षेत्रात अभूतपूर्व असेच होते.
चौकार, षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टेटे, दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला ः मुख्यमंत्री
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वफत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वफत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे.









