रत्नागिरी :
गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर आल्याने जिल्ह्यात सुरक्षा व शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षा चौक्या उभारल्या जाणार असल्याची माहिती दिली. यासोबतच, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यात महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी महामार्गावर सुरक्षा चौक्या उभारल्या जातील. या चौक्यांमधून प्रवाशांना आवश्यक ते सहकार्य पुरवले जाईल, असे सांगितले.
बगाटे यांनी सांगितले की, गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस पाटील व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.
बैठकीत त्यांना गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यामुळे पोलीस व नागरिकांमध्ये समन्वय साधण्यास मदत होईल आणि उत्सव शांततेत पार पडेल. सर्व गणेश मंडळांच्या सहकार्याने शांततापूर्ण गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन अधीक्षक बगाटे यांनी केले आहे.
- संगमेश्वरात पोलीस यंत्रणा दिवस-रात्र दक्ष राहणार
विशेषतः संगमेश्वर येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवस-रात्र कार्यरत राहणार आहे. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांना रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल.








