सांगली :
शाळबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सहा ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य तसेच अनियमित व स्थलांतरीत बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात दि. एक ते १५ जुलै या कालावधीत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
याबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी गायकवाड म्हणाले, सर्वेक्षणासाठी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक हे शहरील व ग्रामीण भागातील सहा ते १८ वयोगटासाठी पर्यवेक्षक तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक हे प्रगणक असतील. अंगणवाडी पर्यवेक्षक या शहरी व ग्रामीण भागातील तीन ते सहा वयोगटासाठी पर्यवेक्षक तर अंगणवाडी सेविका, मदतनीस प्रगणक असतील.
शाळाबाह्य बालकांच्या नोंदीसाठी घरोघरी, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, झोपडपट्टी, गाव, वाड्यावस्त्या, गावाबाहेरची पालं, शेतमळा, स्थलांतरीत कुटुंबे, वीटभट्ट्या, दगडखाणी, फुटपाथ, बालमजूर, भटक्या जमाती, मोठी बांधकामे आदी ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. सर्व स्थळावर प्रत्यक्ष भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी इतर विभागांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
गावात कोणी नवीन कुटुंब आले असल्यास त्यांच्या कुटुंबात असलेल्या मुलाने शाळेत प्रवेश घेतला का याचीही माहिती घेतली जाणार आहे. तसेच टी. सी. घेवून काही विद्यार्थी परजिल्ह्यात गेले आहेत, त्यांनी तेथे शाळेत प्रवेश घेतला का? याचीही माहिती या सर्वेक्षणात घेतली जाणार आहे. काही विद्यार्थी पालकांसोबत कामाच्या ठिकाणी जातात. काहीजण काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. अशा वेळी त्यांचे शिक्षण सुटते, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचाही शोध घेतला जाणार आहे.
- एकही बालक शाळाबाह्य राहू नये
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दि. एक ते १५ जुलै दरम्यान सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणातून एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेवून या उपक्रमाची व्यापक स्वरुपात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणत्याही कारणास्तव सहा ते १४ वर्षे वयोगटातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी








