खानापूर : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हलशी येथील वस्ती बस गेल्या 25 वर्षापासून बंद होती. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अतोनात हाल होत होते. यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष आणि गावकऱ्यांनी हलशी वस्ती बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन खानापूर बस आगारप्रमुख महेश तिरकन्नवर यांनी हलशी बस सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हलशी-खानापूर वस्ती बस ही गेल्या 25 वर्षापूर्वी सुरू होती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची व प्रवाशांची सोय होत होती. मात्र कोणतेही कारण नसताना ही बस अचानक बंद करण्यात आली होती. याबाबत वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेतली गेली नव्हती. मानव हक्क कमिटीचे अध्यक्ष निंगाप्पा होसूर आणि ग्रा.पं. अध्यक्ष पांडुरंग बावकर यांनी खानापूर बस आगारप्रमुख यांच्याकडे हलशी वस्ती बस सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आणि हलशी बस सुरू करणे कीती गरजेचे असल्याचे त्यांना पटवून दिले होते. त्यानंतर महेश तिरकन्नावर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हलशी वस्ती बससेवेला मंजुरी दिली. नुकताच हलशी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बसचे पूजन पांडुरंग बावकर, निंगाप्पा होसूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळू देसाई, मल्लाप्पा सुतार, प्रमोद देसाई, राजू मादार, जोतिबा मळीक, श्रीकांत जाधव, संजय गुरव यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleगुंजीत कचऱ्याचे ढिगारे : कचरागाडी बंदच
Next Article खानापूर तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









