ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे पत्र खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना लिहिलं आहे.
राऊत यांनी हे पत्र ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “गेली 40 वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणासोबत पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात आणि तसे प्रयत्नही झाले. मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरित्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून, मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे.”
राऊत यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.








