जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना सायंकाळी दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याची संपूर्ण माहिती अधिकारी घेत आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था चालक, मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्त यांना आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. 115 मुलं व 54 मुलींची तब्येत स्थिर असून माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ व मिरज येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सरकार म्हणून त्यांची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहोत. त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही. अशी ग्वाही ही मंत्री अतुल सावे यांनी दिली.
उमदी येथील समता आश्रम शाळा येथे 169 मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांच्यावर माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ व मिरज येथे उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री सावे यांनी जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु असलेल्या मुलांशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शिवाय, आरोग्य विभागाला उपचारासाठी योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी मंत्री अतुल सावे पुढे म्हणाले, उमदी येथील आश्रम शाळेत घडलेला प्रकार गंभीर आहे. यातील बेजबाबदार व्यक्तीवर कारवाई करू. अन्न व औषध प्रशासनाकडून सॅम्पल घेतलेले आहेत. यासंदर्भात लवकरच अहवाल प्राप्त होईल. यानंतर संस्था चालक, मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, 115 मुले व 54 मुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना योग्यतो औषधोपचार सुरु आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. असेही मंत्री सावे यांनी स्पष्ट केले. यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, माजी आ. विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाजकल्याणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








