उमदी / वार्ताहर
ऐन पावसाळ्यात ऊन वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात लोक हतबल होताना दिसत आहेत. त्यातच मुळच्या दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील उटगी या गावात पावसाने दडी मारल्याने मेघ राजाला साकडे घालण्यासाठी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून सवाद्य मिरवणूक काढली. मुसळधार पाऊसासाठी प्रार्थना करण्यात आली. याची चर्चा दुष्काळी जत तालुकाभर होत आहे.
पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात असा प्रकार होत असल्याने याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत पूर्व भागाला यावेळी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस नसल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे .पिण्याच्या पाण्यासाठी टंकर ची मागणी होत आहे .जनावराच्या चाऱ्यासाठी चारा छावण्यांची मागणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर मुबलक पाऊस पडावा यासाठी उटगी गावामध्ये गाढवाचं लग्न लावून मिरवणूक करण्यात आली .गाढवाचं लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतोय या श्रद्धेपोटी पारंपारिक पद्धतीने हे लग्न लावण्यात आल. इतकच नाही तर या गाढवाची संवाद्य मिरवणूकही काढण्यात आली.यंदाच्या पावसाळ्यात मृग, आर्द्रापाठोपाठ पुनर्वसू नक्षत्राच्या सरीही कोसळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस पडण्यासाठी ग्रामीण भागात वरूणराजाची करूणा भाकली जात आहे. शिवाय अन्य वेगवेगळे पारंपारिक प्रकारही केले जातात. ‘गाढवाचं लगीन’ हा त्यातला एक प्रकार आहे.राज्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला असताना दुर्दैवाने सांगली जिल्ह्य़ातील जत पूर्व भागात मात्र कमीच पाऊस झाला आहे. जत तालुक्यात तुलनेने पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.









