चोरी, हरवलेले मोबाईलसह ब्लॉक व ट्रॅक करण्यास सक्षम सुविधा : आयएमइआय नंबर बदलला तरीही प्रणाली कार्यरत राहणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आज 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सरकार मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रॅकिंग सिस्टमचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव अधिकृतपणे ‘संचार साथी पोर्टल’ (सीइआयआर) लाँच करणार आहेत. याद्वारे चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक आणि ट्रॅक करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे.
सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (सी-डीओटी) सध्या दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य प्रदेशातील काही दूरसंचार कार्यालयांमध्ये या प्रणालीचा एक पायलट प्रकल्प चालवत आहे, जो आता संपूर्ण भारतात आणण्यासाठी तयार आहे. संचार साथी पोर्टल मोबाईल तस्करीचीही चौकशी करेल असे सी-डीओटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चेअरमन राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले. मोबाईल ब्लॉकिंग आणि ट्रॅकिंग सिस्टीम भारतभर सुरू करण्यासाठी सज्ज आहे. या तिमाहीत ते संपूर्ण भारतात आणले जाणार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला आहे.
‘सिस्टीममध्ये एक अंगभूत यंत्रणा आहे जी मोबाईलच्या तस्करीलाही आळा घालेल’. मात्र, ते कधी सुरू होणार याची निश्चित तारीख त्यांनी दिलेली नाही.
आयएमईआय नंबर बदलल्यानंतरही फोन ट्रॅक करता येतोसध्या, गुन्हेगार मोबाइल चोरल्यानंतर डिव्हाइसचा आयएमईआय क्रमांक बदलतात, त्यामुळे मोबाइल ट्रॅक किंवा ब्लॉक करता येत नाही. राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, हे पोर्टल आयएमइआय नंबर बदलल्यानंतरही डिव्हाइस ट्रॅक आणि ब्लॉक करण्यास सक्षम असेल.
पोर्टलच्या मदतीने 8000 फोन जप्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पोर्टलद्वारे आतापर्यंत 4.70 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. यासोबतच 2.40 लाखांहून अधिक मोबाईल ट्रॅक करण्यात आले आहेत. तर पोर्टलच्या मदतीने 8000 फोनही जप्त करण्यात आले आहेत. अलीकडेच, कर्नाटक पोलिसांनी पोर्टलच्या मदतीने 2500 हून अधिक हरवलेले मोबाईल परत मिळवून मालकाच्या ताब्यात दिले असल्याची माहितीही आहे.









