पुणे / प्रतिनिधी :
राज्यभरातील कारागृहात बंदीस्त असेलेल्या तसेच कारागृह उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कुशल बंदी, अर्धकुशल बंदी, अकुशल बंदी, खुल्या वसाहतीतील बंद्यांना ही पगार वाढ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे कारागृह विभाग पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी दिली.
राज्यातील विविध कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्याअंतर्गत बंदी असलेल्या कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या व्यवसायिक कौशल्याचे शिक्षण दिले जाते. यासाठी कारागृहांमध्ये विविध उद्योग सुरु करण्यात आलेले आहेत. या कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणारे कैदी हे बऱ्याच दिवसांपासून ज्या प्रमाणे विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठराविक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते.त्याच धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करत होते. अखेर त्यांची मागणी मान्य झाली आहे.कैदी कारागृहातील उद्योगांमध्ये काम करून आर्थिक मोबदला कमवतात व त्यातून स्वतःसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपहारगृहातून खरेदी करतात तसेच स्वतःच्या कुटुंबियांना त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी पोस्टाच्या माध्यमातून मनिऑर्डर करतात, काही बंदी मिळालेल्या आर्थिक मोबदल्यातून वकिलांची फी भरतात अशा अनेक कामांसाठी बंद्यांना स्वतः खर्च करता येतो त्यामुळे कैद्यांमध्ये स्वावलंबी असल्याची भावना निर्माण होते.
अशाप्रकारे मिळणार लाभ
कारागृह उद्योगात काम करणाऱ्या कुशल बंद्याना प्रती दिवस ७४ रुपये, अर्धकुशल बंद्याना ६७ रुपये, अकुशल बंद्याना ५३ रुपये, तर खुल्या वसाहतीतील बंद्यांना ९४ रुपये अशी भरघोस पगार वाढ देण्यात आली आहे. राज्यातील सर्व ६० कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार कैदी काम करत आहेत. यामध्ये पुरुष कैदी हे ६ हजार ३०० व महिला बंदी ३०० च्या आसपास आहेत. या पगारवाढीचा लाभ अंदाजे सात हजार बंद्यांना होईल, असे गुप्ता म्हणाले.








