प्रतिनिधी /कुडचडे
गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला ‘प्रधानमंत्री रोजगार मेळा’ हा आणखी एक जुमला आहे, अशी टीका करून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
शनिवारी राज्यात शासनातर्फे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमात काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटकर यांनी सदर रोजगार मेळावा हे लोकांना फसवायचे नाटक असल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नियुक्तीपत्रे सुपूर्द केलेल्या विविध सरकारी खात्यांतील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल गोव्यातील सुशिक्षित तरुणांना जाणून घ्यायचे आहे. निवडलेल्या सर्व उमेदवारांची नावे, पत्ते, शैक्षणिक पात्रता यासह सर्व माहिती गोमंतकीयांना कळू द्या, असे पाटकर यांनी म्हटले आहे. या रोजगार मेळाव्यात टपाल खात्यात काही लोकांची भरती झाली आहे. पण आठ ते दहा वर्षे काम केल्यानंतर अचानक सेवेतून काढून टाकलेल्या फोंडय़ातील सात पोस्टमनचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांकडे त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मला मिळालेल्या माहितीनुसार, जे लोक कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यांना आता कायमस्वरूपी नियुक्तीची पत्रे देण्यात आली आहेत. हे जर खरे असेल, तर मोदी सरकार नोकऱया देत नसून केवळ सेवा नियमित करत आहे, असा दावा पाटकर यांनी केला आहे. सरकारने गोव्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या ‘प्रधानमंत्री रोजगार मेळाव्या’त नियुक्तीपत्रे दिलेले उमेदवार कधी, कसे आणि कोणी निवडले हे सांगणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर माहिती सोशल मीडियावरून तसेच स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करावी. वस्तुस्थिती लोकांसमोर येऊ द्या, असे आवाहन पाटकर यांनी केले आहे.









