कोल्हापूर :
‘अलमट्टी’ धरणाच्या उंची वाढविण्याच्या निर्णया विरोधात कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्यातील ‘अलमट्टी’ धरण उंची वाढ संघर्ष समितीच्यावतीने 18 मे सांगली जिल्ह्यातील अंकली पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
अलमटी धरणाच्या उंची वाढविण्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी शाहू मार्केट यार्ड मधील मार्केट कमिटीच्या कार्यालजवळील मल्टीपर्पज हॉलमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्यातील पुरबाधीत शेतकरी, व्यापारी, दुकानदार व पुरबाधीत लोकांचा सर्वपक्षीय मेळावा झाला. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी अलमटी धरणाची उंची 519 मीटर वरुन 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे असे जाहीर केले आहे. कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाने यास मान्यता दिलेली आहे. लवकरच केंद्राकडून यास मान्यता मिळेल. केंद्रीय मंत्री महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणी कर्नाटक राज्याची बैठक घेतील व निर्णय जाहीर करतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटक सरकारने यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे.
सन-2019 व 2021 सालाच्या महाप्रलंयकारी महापुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिह्याचे फार मोठे नुकसान झाले होते. महापुरास ज्याप्रमाणे अतिवृष्टी हे एक कारण आहे त्याप्रमाणेच कर्नाटक राज्यातील ‘अलमटी धरण‘ हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे वेळीच कर्नाटकचे नाटक थांबले पाहिजे अशा भावना मेळाव्यात व्यक्त करण्यात आल्या.
आमदार सतेज पाटील म्हणाले, अलमटी धरणाची उंची वाढविली तर नदी काठच्या जमीनी नापीक होतील. जमीनीमध्ये 15 ते 20 दिवस पाणी साचून राहील व पिके कुजून जातील. त्यामुळे या धरणाच्या उंचीस विरोध करणे गरजेचे आहे.धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात 18 मे रोजी अंकली पुलाजवळ रास्ता रोको करण्याचे जाहीर केले.या निर्णयाला उपस्थितांनी पाठिंबा दर्शवला.
आमदार अरुण लाड म्हणाले, अलमटी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र रोष आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन लाड यांनी केले.
वडनेरे समितीचा अहवाल संपुर्ण चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही पण त्या अहवालात त्रुटी आहेत. हे सन-2019 व 2021 साली अलमटी धरणातील पाणी विसर्ग समन्वय समितीच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे हे देखील मान्य करावे लागेल अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कर्नाटक शासनाने धरणाची उंची 519 कायम ठेवावी अन्यथा अलमटी धरणाचे अस्तित्व राहणार नाही याची दखल केंद्र सरकारने घ्यावी असा इशारा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने देण्यात आला.
मेळाव्यास माजी आमदार उल्हासदादा पाटील, विजय देवणे, संजय शेटे, संजय परीट, अमर समर्थ, आर.जी.तांबे, विक्रांत पाटील –किणीकर, भारत पाटील– भुयेकर, प्रा. लगारे, सर्जेराव पाटील, शशिकांत पाटील –चुयेकर, बाबासो चौगले, बी.एच. पाटील, सुयोग पाटील, चंद्रकांत पाटील–पाडळीकर बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, कोल्हापूर सांगली जिह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी शेतकरी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, आंदोलन अंकुश व मुर्तीकार संघटना या संघटना मेळाव्यात सामील झाल्या होत्या.
- पालकमंत्र्यांना सांगून महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊ
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांना नेमकी वस्तुस्थिती सांगू. यानंतर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून देवू. या लढ्यात आपण अग्रेसर राहू.
–खासदार धैर्यशील माने








