चुरशीच्या संघर्षात बहुमत मिळणार असे अनुमान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा आता अगदी जवळ आलेला असताना ‘टाईम्स नाऊ-जेव्हीसी’ या संस्थेने केलेल्या मतदानपूर्ण सर्वेक्षणात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा बहुमत मिळेल, असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील या आघाडीला चुरशीच्या संघर्षात बिहार विधानसभेच्या एकंदर 243 जागांपैकी 120 ते 140 जागा मिळतील, अशी शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
विरोधी ‘महागठबंधन’ला पुन्हा विरोधी पक्षातच बसावे लागणार असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. विरोधी पक्षांना एकंदर 93 ते 112 जागा मिळण्याचे अनुमान आहे. जनसुराज पक्ष आणि इतरांना केवळ 15 ते 20 जागा मिळतील अशी शक्यता आजमावण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार करता, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 41 ते 43 टक्के मते, महागठबंधनला 39 ते 41 टक्के मते, तसेच जनसुराज पक्षाला 6 ते 7 टक्के, तर अपक्ष आणि इतरांना 10 ते 12 टक्के मते मिळू शकतील, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे.
पक्षनिहाय जागांचे अनुमान
या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला 101 पैकी 70 ते 81, संकुक्त जनदा दलाला 101 पैकी 42 ते 48, लोकजनशक्ती (रामविलास पासवान) पक्षाला 29 पैकी 5 ते 7, हम पक्षाला 6 पैकी 2 आणि आरएलएम पक्षाला 6 पैकी 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दलाला 143 पैकी 69 ते 78, काँग्रेसला 61 पैकी 9 ते 17, सीपीआयएमएलला 30 पैकी 12 ते 14, सीपीआयला 5 पैकी 1 सीपीआयएमला 5 पैकी 1 ते 2, व्हीआयपीला 15 पैकी 1 ते 2 अशा जागा मिळण्याची शक्यता आहे. 12 ते 15 मतदारसंघांमध्ये महागठबंधनचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात संघर्षात आहेत.









