सुहासिनींकडून विधीवत पूजा, प्रतिष्ठापना अन् रंगला जागर; आज सर्वत्र ‘औसा’ भरण्याचा कार्यकम
रत्नागिरी प्रतिनिधी
कोकणात विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणरायापाठोपाठच 3 दिवसांनी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे सुहासिनींनी अगदी मोठ्या थाटात व उत्साहात आगमन केले. घरोघरी गौराईचे विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना केली. दोन दिवस साऱ्या महिला गौराईचा पाहुणचाराचा जागर तितक्याच लाडाने करण्यात दंग राहणार आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत होतो. गेली दोन वर्षे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा झाला. पण यावर्षी हे संकट टळल्यानंतर गणेशोत्सवात सारेच मग्न झाले आहेत. अशा या गणेशोत्सवात गौरी पूजनालाही तितकेच महत्व आहे.
गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी…वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. विविध प्रांतानुसार गौरीपूजनाची प्रथा आहे. गौरीपूजन सोहळ्याची प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा आहे. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण असलेल्या गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची तर खड्यांच्या गौरींची पद्धत आहे. रत्नागिरीत गौरी आवाहन करुन गावोगावी गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी विहिरीवरुन, नदीवरुन सात खड्यांच्या रुपात गौरी आणली जाते. तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवून त्यांची पूजा व आराधना केली जाते. बऱ्याच भागात लाकडी गौरी किंवा त्यांचे मुखवटेही असतात. शनिवारी या लाडक्या गौराईचे मोठ्या थाटात महिला, कुमारीकांनी त्या-त्या ठिकाणच्या पाणवठ्यावरून आगमन केले. घरी आल्यानंतर महिलांनी आपल्या लाडक्या गौरीचा साजश्रुंगार करून तिला नटवण्यात आले. गणरायाच्या शेजारी दोन दिवस गौराईला पूजनाचा मान मिळणार आहे.
पाहुणचाराचा जागर रंगणार
आता दोन दिवस महिलांकडून गौराईची आराधना, आरती, विविध गीते, गाणी असातिच्या पाहुणचाराचा जागर रंगणार आहे. विवाहित महिला आपल्या सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी आणि कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे, यासाठी गौरी पूजा व्रत करतात. आज रविवारी गौरी पूजनात गौरीला गोडाचा तसेच काही ठिकाणी तिखट (सामिष) नैवेद्य केला जाणार आहे. पाच दिवसांच्या गणपतीसोबतच सोमवारी विसर्जनादिवशीच गणेशाबरोबर गौरीचे विसर्जन केले जाणार आहे.









