वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा माजी अष्टपैलु ऋषी धवनने सोमवारी येथे राष्ट्रीय मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा ही धवनची शेवटची राहिल.
2016 साली ऋषी धवनने 3 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 2024-25 च्या क्रिकेट हंगामातील विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघाला बाद फेरी गाठता न आल्याने या संघाकडून खेळणाऱ्या ऋषी धवनने निवृत्तीची घोषणा केली. मात्र चालु वर्षीच्या रणजी हंगामातील उर्वरित सामन्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे 34 वर्षीय धवनने म्हटले आहे. धवनने लिस्ट ए प्रकारातील 134 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने फलंदाजीत 2906 धावा तर गोलंदाजीत 118 गडी बाद केले.









