किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/गुंजी
गुंजीसह परिसरात भातपिकावर करपा रोगाची लागण झाली असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी पावसाने पेरणी हंगामातच थैमान घातल्याने येथील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करुनही भात उगवण झाली नाही. तर अनेकांची भात उगवण होऊन देखील शिवारात पाणी तुंबल्याने भात कुजून गेले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना रोप लागवड करावी लागली आहे. परंतु गेल्या आठ-दहा दिवसापासून या परिसरामध्ये ऊन-पाऊस सुरू असल्याने उशिरा लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या भातपिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे येथील शिवार पिवळे होऊन तांबूस होऊन करपून जात असल्याने पिकाची वाढ खुंटत आहे. एकीकडे पावसामुळे काबाडकष्ट करूनही दोन-दोन वेळा पेरणी केलेले भात वाया गेले. एवढे होऊनही शेतकऱ्यांनी पुन्हा रोप लागवड केली असली तरी त्यावर किडींचा प्रादुर्भाव वेढल्याने येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
औषध फवारणी करण्याची गरज
या किडीच्या प्रादुर्भावाविषयी येथील कृषी खात्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच त्वरित औषध फवारणी करण्याची गरज व्यक्त केली. त्याकरिता गुंजी कृषी खात्यामध्ये औषधे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कृषी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.









