पुणे / प्रतिनिधी :
जगभरात युद्धप्रकारांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. पारंपरिक युद्धप्रकाराबरोबर नव्या आव्हानांचा आता सामना करावा लागत आहे. जमिनीवरील आणि हवाई युद्धाबरोबर सायबर आणि अवकाश क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत संपर्करहित (कॉन्टॅक्टलेस) आणि अगतिज (नॉन कायनेटिक) काम करणाऱया पद्धतींचा विकास करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात अधिक संशोधन महत्त्वपूर्ण असल्याचे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या (डाएट) पदवीप्रदान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. ते म्हणाले, संशोधनाला पंख देण्याच्या उद्देशातून या संस्थेची स्थापना झाली आहे. त्यामुळे संशोधन आणि विकास यावरच प्राधान्याने भर राहिला आहे. संरक्षण क्षेत्राबरोबरच नागर समाजाला उपयुक्त ठरेल, असे नाविन्यपूर्ण संशोधन करायला हवे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. संरक्षण उत्पादनांची आयात करण्यापेक्षा भविष्यात निर्यातदार होण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.








