रत्नागिरी :
राज्य शासनाचे आतापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभाग हा दुर्लक्षित विभाग होता. पण या विभागाला बळकटी देत कारभार गतिमान करण्यासाठी १९० नवीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कमी असलेली ड्रग्ज इन्स्पेक्टरची संख्या भरून काढण्याची मागणी वरिष्ठ विभागाकडे करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रत्नागिरीत रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री कदम हे आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाची पकड पदभरतीद्वारे नव्या अधिक मजबूत करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडे ग्राहकांना विक्री केल्या जाणाऱ्या दुधाची भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई केल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले. त्यासाठी नवे तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. या कारवाईसाठी जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर मोठी व्याप्ती असलेल्या महसूल खात्यांतर्गत आता एआय तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. जेणेकरून अगदी तळात असलेल्या तलाठी कार्यालयातून नागरिकांना मिळणाऱ्या दाखल्यांसाठी त्रास न होता ते दाखले मिळणे सुलभ होईल. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल असेही मंत्री कदम यांनी सांगितले.








