वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या आरसीबी व केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होती. त्यामुळे टॉसही होऊ शकला नाही. मात्र त्यानंतर बराच वेळ पाऊस थांबवण्याची आणि खेळपट्टी कोरडी होण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र खेळ होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट होताच सामना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघ अधिकृतपणे आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर आरसीबीचा संघ सर्वाधिक 17 गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या स्थानी पोहोचला असला तरी संघ प्लेऑफसाठी अधिकृतपणे पात्र ठरलेला नाही.









