रत्नागिरी :
राज्याचा मराठी भाषा मंत्री म्हणून मला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाग्य लाभले. यासाठी मी केवळ आणि केवळ रत्नागिरीकरांचा ऋणी आहे. त्यांनी मला सलग पाचवेळा विधानसभेत पाठवून मोठा वाटा उचलला आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यागृहात मंत्री सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, गजानन पाटील, आनंद शेलार, निमेश नायर आणि सर्व माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने रत्नागिरीकर उपस्थित होते.
- दामले कुटुंबियांचा सन्मान
स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगाव येथे स्थानबद्ध असलेल्या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आठवणींना सामंत यांनी उजाळा दिला. सावरकर ज्या दामले कुटुंबियांकडे राहत होते, त्या सर्व दामले कुटुंबियांचा या कार्यक्रमात सामंत यांच्या हस्ते जाहीर सन्मान करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने साजरा केला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.








