कोल्हापूर :
अंबाई टँक परिसरात असणाऱ्या रंकाळा पदपथ उद्यानाची अवस्था रामभरोसे झाली आहे. येथील दोन ठिकाणी सुरक्षा भिंत कोसळली आहे. शिल्पकलेतील वास्तूंची दयनिय स्थिती आहे. लॉनचे कटिंग वेळेवर केले जात नसल्याने गवताचे साम्राज्य झाले आहे. घसरगुंडीसह लहान मुलांच्या खेळाच्या साहित्याची दुरवस्था झाली असून झोपळ्याच्या परिसरात पाणी साचले आहे.
कोल्हापूरमध्ये भाविक किंवा पर्यटक आल्यानंतर करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आवर्जुन रंकाळा तलाव पाहण्यासाठी जातात. याचबरोबर कोल्हापुरातील स्थानिक नागरिकही रोज या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. या ठिकाणी आकर्षक विद्युतरोषणाई केल्यामुळे गर्दी वाढतच चालली आहे. एकीकडे अशी स्थिती असताना रंकाळा तलावाच्या पश्चिमेस असलेल्या रंकाळा पदपथ उद्यानाची मात्र, दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून येथील उद्यानाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. अपुरे कर्मचारी असल्याने लॉनचे कटिंगचे काम वेळच्यावेळी होत नाही. परिणामी येथे गवतसह अन्य झाडे झुडपे उगवली आहेत. उद्यानातील बाकडे मोडले आहेत. विशेष म्हणजे नव्याने लोखंडी बसवलेले बाकडेही खराब झाले आहेत. उद्यानामध्ये लहानमुलांसाठी बसविलेली खेळण्याची साहित्याची दुरवस्था झाली आहे. झोपळ्याच्या परिसरात पाणी साचले असून घसरगुंडीचीही दयनीय स्थिती झाली आहे. रंकाळा पदपथ उद्यानात नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. परिणामी कोल्हापूर शहराची प्रतिमा मलिन होत असून महापालिकेने येथे लक्ष देण्याची गरज आहे.

- शिल्पकलेवरील लाखोंचा निधी ‘पाण्यात’
रंकाळा तलावासह पदपथ उद्यानात लाखो रुपयांचा निधी खर्च करून शिल्पकलेच्या वास्तू उभा केल्या आहेत. यामध्ये प्रतिकात्मक हत्ती, मगरसह अन्य प्राणी ठेवले आहेत. परंतू काही विघ्नसंतोषींनी याची नासधूस केली आहे. यावर केलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे.
- पर्यटकांच्या जीवाला धोका
रंकाळा पदपथ उद्यानात दोन ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली आहे. मनपा प्रशासनाने तेथे बॅरेकट लावले असले तरी पर्यटक कोसळलेल्या सुरक्षा भिंतीजवळ उभा राहून तलाव पाहत असल्याचे दिसून येते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असतो. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच मनपाने सुरक्षा भिंत बांधणे आवश्यक होते.

- नागरिकांचीही जबाबदारी महत्वाची
रंकाळा तलावामध्ये प्लास्टिक कचरा टाकला जातो. विशेषत: पिण्याच्या बॉटलीची संख्या जास्त आहे. प्रतिकात्मक प्राण्याची नासधूस केली जाते. त्यामुळे उद्यान सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी मनपा सोबत पर्यटक, नागरिकांचीही जबाबदारी महत्वाची आहे.
- महापालिकेने वेळच्यावेळी लक्ष देणे गरजेचे
ओपन जीमसह लॉनचे वेळच्या वेळी मेंटनन्स झाला पाहिजे. अंबाई टँक परिसरात शहरातील लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक उन्ह असो वा पावसाळा ते फिरण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी वेटिंग शेडची उभारणी करावी. महापालिकेने प्राधान्यक्रमाने उद्यानातील दुरवस्थेवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. विशेषत: संरक्षक भिंतीचे काम तत्काळ सुरू करावे.
– संजय कवठेकर,रहिवासी, अंबाई टँक परिसर








