स्वामी अद्वैतानंद : चिन्मय मिशनतर्फे प्रवचनाचे आयोजन : रामायणातील विविध प्रसंगांवर प्रवचनमाला
बेळगाव : सध्या आपले मन केवळ पैसा, नातेसंबंध व खाद्यपदार्थांमध्ये अडकले आहे. परमेश्वराची आठवणसुद्धा आपल्याला होत नाही. परंतु परमेश्वरापासून जेवढे दूर जाल तेवढ्या समस्या, दु:ख, तणाव वाढत जातील. सुखाप्रती जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रामायण. जीवनात शांती, समाधान हवे असेल तर रामायण नक्की ऐकावे. रामायण हा ग्रंथ नसून, ते परमेश्वराचे घर असल्याने तेथून अनेक संस्कार आपल्यावर घडतात, असे उद्गार स्वामी अद्वैतानंद यांनी काढले. चिन्मय मिशन बेळगावच्यावतीने गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहामध्ये स्वामी अद्वैतानंद यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या प्रवचनमालेतील पहिले पुष्प त्यांनी ‘रामायणातील विविध प्रसंग’ या विषयावर गुंफले. अत्यंत रसाळ वाणीने त्यांनी रामायणातील प्रसंग सादर केले. सत्संग हा स्वर्गाप्रमाणे असून, परमेश्वराशी समरुप होण्याचा मार्ग आहे. आपल्या जीवनात अशांती जास्त असून, विश्रांती मात्र खूप कमी आहे. सर्वांना समाधान देण्यासाठी परमेश्वराशिवाय पर्याय नाही. आज प्रत्येकाजवळ पैसा, संपत्ती आहे.
परंतु मनशांती कुठेही मिळत नसल्याने मन इतरत्र भटकत आहे. संतांनीही रामायणाचे कौतुक केले असून, वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचे 60 ते 70 गुण दाखविण्यात आले आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भोवती मर्यादा घालून घेतल्या होत्या. त्यामुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते, असे स्वामीजींनी सांगितले. प्रारंभी स्वामी अद्वैतानंदजी, स्वामिनी प्रज्ञानंदा, अभय कुलकर्णी, राजेंद्र केंकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. चिन्मय मिशनचे अभय कुलकर्णी यांनी स्वामीजींचे स्वागत केले. अऊण सामंत, निशा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. महाबळेश्वर साबन्नवर यांनी प्रवचनाला तबला साथ दिली. 10 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के वेणूगोपाल सभागृहात प्रवचन होणार आहे. तर 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील चिन्मय वंदना येथे ‘चतुश्लोकी भागवत’ या विषयावर अद्वैतानंदजी मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दैनंदिन जीवनात रामायणाचा चुकीचा वापर
उत्तर व मध्य भारतामध्ये रामायण शब्दाचा वापर चुकीच्या अर्थाने घेतला जातो. स्वत:चे दु:ख सांगणाऱ्या व्यक्तीला तू रामायण सांगू नकोस, असे म्हटले जाते. परंतु रामायण हे दु:खाचे कथन करणारे चरित्र नसून दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविणारा महाग्रंथ असल्याचे स्वामी अद्वैतानंद यांनी सांगितले.









