संपर्क प्रमुख शरद कणसे यांची घोषणा
कराड: नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. पालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्या वाटाघाटी सुरू राहतील किंवा स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल. ती तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी व प्रचारास सुरुवात करावी, अशी घोषणा शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी केली.
कराड नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचा मेळावा येथे पार पडला. त्यावेळी बोलताना राजेंद्रसिंह यादव यांच्या उमेदवारीची घोषणा शरद कणसे यांनी केली. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी नगराध्यक्ष संगीता देसाई, माजी सभापती विजय वाटेगावकर, शहर प्रमुख राजेंद्र माने यांच्यासह सर्व माजी नगरसेवक व आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद कणसे म्हणाले की, राजेंद्रसिंह यादव यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी कराडच्या विकासाचे सुमारे १०० कोटींचे प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केले होते. तो निधी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी कराडमध्ये दिला होता, मात्र देताना सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी कराड शहरासाठी दिला. केवळ प्रवेशाच्या वेळेला इतका निधी दिला तर राजेंद्रसिंह यादव हे नगराध्यक्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे किती निधी देतील, याचाही विचार कराडकरांनी करावा.
कराड शहराचे गावपण टिकवण्यासाठी व शहराच्या परंपरेचे जतन करण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगून राजेंद्रसिंहयादव म्हणाले की, कराड शहराच्या हितासाठी आपण छातीचा कोट करू. सध्या निवडणुकीच्या बातावरणात मला अडचणीत आणले. खिंडीत आणले, अशा चर्चा शहरात सुरू आहेत. मात्र जीवात जीव आहे, तोपर्यंत आपण धनुष्यबाणासोबत राहणार असून लढणे आपल्या रक्तात साथीने तयार आहोत.
शहरातले राजकीय बातावरण गढूळ झाले असून ते स्वच्छ करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगदान द्यावे. कराड शहराचा २०५६ सालचा विकास लक्षात घेऊन सर्व विकासकामे आम्ही मार्गी लावली आहेत. अनेक विकासकामे भविष्यात करायची असून त्याचे प्रस्ताव तयार आहेत. त्याचा पाठपुरावा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीला निवड सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असेही यादव म्हणाले.








