रत्नागिरी :
तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्तंगत कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवार 13 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अमित गणेश चव्हाण (22, रा. राजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांना होळी सणाची सुट्टी असल्याने अमित चव्हाण हा बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला. घरी गेलेला अमित दुसऱ्या दिवशी गुऊवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला. रुममध्ये आल्यावर ऊमचा दरवाजा लावून घेत त्याने स्वत:ला बंद करून घेतले होते.
रुम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आतमध्ये असलेल्या अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे विद्यार्थ्याच्या मनात संशय बळावला. विद्यार्थ्यांनी तत्काळ याबाबतची कल्पना येथील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. दरवाजा उघडताच अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. यावेळी रुममध्ये बियरची बाटलीदेखील सापडल्याचे समजते.
परंतु अमितने इतकं टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनीदेखील वस्तीगृहाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहे. याच वसतिगृहात काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे एका मुलाने आत्महत्या केली होती. त्यानंतर ही याठिकाणची आत्महत्येची दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.








