राजापूर :
राजापूर शहर बाजारपेठेत रस्त्यालगत काही जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यापूर्वी अनेकदा नगर परिषद प्रशासनाने संबंधित इमारत मालकांना नोटीसा बजावून धोकादायक इमारती हटविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही शहर बाजारपेठेत काही जीर्ण इमारती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींचा योग्य तो बंदोबस्त न केल्यास कारवाई करण्याचा इशारा नगर परिषदेने दिला आहे.
राजापूर शहर हे ब्रिटीशकालीन बंदर म्हणून प्रसिद्ध होते. आजही अनेक जुन्या इमारती राजापूर शहर बाजारपेठेत आहेत. मात्र वर्षानुवर्षे अशा इमारतींमध्ये वास्तव्य नसल्याने काही इमारती जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यापूर्वी शहर बाजारपेठेतील रस्त्यालगत असलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटनाही घडली आहे. राजापूर बाजारपेठेत दाटीवाटीने दुकाने वसली आहेत. त्यातच बाजारपेठेतील रस्त्यावर ग्राहकांसह शहरातील नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशावेळी या धोकादायक इमारतींमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वी धोकादायक इमारत कोसळण्याची घटना घडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने अशा इमारत मालकांना इमारत कोसळून घेण्याबाबतची नोटीसा बजावल्या होत्या. तसेच धोकादायक इमारती स्वतःहून उतरवून न घेतल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशाराही नगर परिषद प्रशासनाने दिला होता. मात्र अद्यापही काही धोकादायक इमारती तशाच असून नगर परिषद प्रशासन आता अशा धोकादायक इमारतींविरोधात ‘अॅक्शन’ मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे.
यावर्षीच्या पावसाळी हंगामात शहरातील धोकादायक इमारतींमुळे होणारी संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित मालकांनी धोकादायक इमारती तत्काळ हटवाव्यात. तसेच धोकादायक झाडांचाही बंदोबस्त करावा, अन्यथा संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे








