ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी 35 समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. राजभवनात आज अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करत आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्मया खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळय़ांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की, येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.”








