पुणे / प्रतिनिधी :
पुढील काही दिवसांत कोकण-गोव्यासह देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उष्णतेचा कडाका कमी होण्याची चिन्हे आहेत.
मध्य पाकिस्ताच्या भागावर सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, हे क्षेत्र वायव्य भारताकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे तसेच अरबी समुद्राकडून या क्षेत्राकडे बाष्प खेचले जाणार असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस वायव्य भारत तसेच उत्तर भारतातील अनेक राज्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ अर्थात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार तसेच झारखंडपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती असल्याने गंगेच्या खोऱ्यातील राज्यांनाही पावसाचा इशारा आहे. यात राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पूर्वोत्तर राज्यातही पावसाचा इशारा आहे.
महाराष्ट्र, दक्षिणेकडे पाऊस
विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र मराठवाडा, कर्नाटकच्या भागावरून जात आहे. तसेच अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने याच्या प्रभावामुळे कोकण-गोवा, दक्षिण महाराष्ट्र, बेळगावसह अनेक भागांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या क्षेत्राचा परिणाम आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान याच्या प्रभावामुळे कोकण-गोव्यात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
काहिली कमी होणार
वरील सर्व क्षेत्रांच्या प्रभावामुळे देशभरातील काही भागांत नोंदविण्यात आलेली उष्णतेची लाट तसेच कमाल तापमानात घट होणार असून, वायव्य, मध्य, पश्चिम व पूर्व भारतातील कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी दिल्ली, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली.
कर्नाटकात ‘यलो अलर्ट’
कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक तसेच कर्नाटक किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनसाठी पोषक स्थिती
मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.









