अमेरिकेतील व्याख्यानात महाराष्ट्रातील निवडणुकीचा मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था/ बोस्टन
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले. रविवारी संध्याकाळी त्यांनी भारतीय डायस्पोराला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी निवडणूक आयोगातील व्यवस्थेत काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित करत भारतीय निवडणूक आयोगाशी तडजोड करण्यात आल्याचा दावा केला.
राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री उशिरा ते अमेरिकेतील बोस्टन विमानतळावर उतरले. या दौऱ्यात त्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रोड आयलंड येथील ब्राऊन विद्यापीठाला भेट देऊन त्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याचदरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगातील अनियमिततेवर भाष्य केले. महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 5:30 ते 7:30 दरम्यान 65 लाख मते पडल्याचे निदर्शनास आले आहे. ही आकडेवारी गोंधळ निर्माण करणारी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. केवळ दोन तासांत 65 लाख मतदान होणे अशक्य आहे. मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे 3 मिनिटे लागतात. जर या मतांचे गणित मांडले तर मतदारांना पहाटे 2 वाजेपर्यंत रांगेत उभे राहायला हवे होते, पण तसे झाले नाही. याबाबत जेव्हा आम्ही निवडणुकीची व्हिडिओग्राफी मागितली तेव्हा आयोगाने स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनी कायदा बदलत आम्ही व्हिडिओबद्दल पुढील प्रश्न विचारू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण केल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींवर भाजपचा प्रतिहल्ला
राहुल गांधींच्या विधानावर भारतीय जनता पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. परदेशात देशाचा अपमान करणे ही राहुल गांधींची जुनी सवय आहे. असे कारनामे ते बऱ्याच काळापासून करत आहेत. ईडीने त्यांच्या आरोपपत्रात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची नावे नमूद केली आहेत आणि देशाला लुटल्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते. काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात अशांततेचे वातावरण निर्माण करत आहे, असे संबित पात्रा म्हणाले.
मतदारयादीत नावे घुसडल्याचा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन करण्यात आला होता. भाजपचा विजय सोयीस्कर होण्यासाठी मतदारयादीत नवीन मतदार समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबतही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडून मतदारांचा डेटा मागितला होता.









