२७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार लक्षवेधी धरणे आंदोलन
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होण्यासाठी सिंधुदुर्गनगरीतील नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही राजकीय इच्छाशक्ती अभावी दखल घेतली जात नसल्याने आता सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतली असून नगरपंचायतीच्या मागणीसाठी २७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीच्या मागणीसाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन शुक्रवारी मुख्यालय पत्रकार संघामार्फत निवेदन देण्यात आले .यावेळी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,सचिव लवू म्हाडेश्वर,उपाध्यक्ष विनोद परब,नंदकुमार आयरे,दत्तप्रसाद वालावलकर,विनोद दळवी,मनोज वारंग आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची शहरे नगरपंचायत किंवा नगर परिषदा झाल्या. मात्र गेली कित्येक वर्ष प्रस्तावित असूनही, सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीच्या मंजुरीला मात्र अद्याप मुहूर्त मिळत नाही.हा मुहूर्त लवकरात लवकर मिळावा यासाठी सिंधुदूर्गनगरी मुख्यालय पत्रकारांनी पुढाकार घेऊन आंदोलनाचे शस्त्र उचलावे लागत आहे आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यालय पत्रकार संघामार्फत सांगण्यात आले.
मुख्यालय पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रकार असे नमूद करण्यात आले आहे की ,सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हा मुख्यालयाची निर्मिती सिंधुदुर्गनगरी येथे होवून ३० वर्ष उलटली मात्र या ठिकाणी, स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपंचायत होवू न शकल्याने सिंधुदुर्गनगरी शहराचा अपेक्षित विकास होवू शकलेला नाही. सिधुदुर्गनगरी साठी नवनगर विकास प्राधिकरण आहे मात्र प्राधिकरणजवळ विकास निधी नसल्याने विकास कामे करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास व्हायचा असेल तर नगरपंचायत होणे अत्यंत आवश्यक आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत किंवा नगरपालिका झालेल्या आहेत. मात्र एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा त्याला अपवाद आहे. सिंधुदुर्गनगरी शहरातील लोकवस्ती वाढत आहे. मात्र त्याना नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे सातत्याने नगरपंचायत होण्यासाठी मागणी केली जात आहे. मात्र प्रत्येकवेळी मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाकडून आश्वासनेच मिळाली. प्रत्यक्षात आजपर्यंत नगरपंचायत होवू शकलेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्माण होण्याच्या आग्रही मागणीसाठी सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पुढील एक महिन्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीबाबत ठोस पावले न उचलल्यास नागरिकांच्या सहभागाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.









