Kolhapur News : जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून सोशल मीडियाव्दारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पुन्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 19 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार असल्याची माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. यानुसार जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे,मिरवणुका काढणे व सभा घेण्यास बंदी आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापुरात दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता.यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शस्त्रे,सोटे, तलवारी,भाले,दंडे,बंदूका,सुऱ्या,काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे.कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे,जमा करणे किंवा तयार करणे.व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन.जाहिरपणे घोषणा करणे,गाणी म्हणणे,वाद्ये वाजविणे.ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे चिन्हे,फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे,त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.










