पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा विचार करता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला जास्त काळ लागणार नाही, लवकरच याबाबत निर्णय होऊन येत्या आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा सर्वात फिट मंत्री म्हणून उल्लेख केला. यावर महाजन यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ‘आज फ्रेंड्सशिप डे आहे. सुरुवातीपासून आमच्या दोघात खूप राजकीय विरोध होता. त्यांनी २० वर्षात माझ्या मतदारसंघात एक रुपयाही पारितोषक म्हणून दिले नाही. मात्र, आता ते आमच्याबरोबर आहेत आणि ते नेहमी भेटल्यावर माझ्या फिटनेसचे कौतुक करतात’, असे गिरीश महाजन म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आज शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी परिस्थिती झाली आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती काँग्रेसची होणार आहे. तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा आणि मग आघाडी करा’, असा टोला त्यांनी वडेट्टीवारांना लगावला.
लोकसभा निवडणुकीबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, ‘आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाणार आहे. राज्यातील सर्व ४८ जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही एकही जागा हरणार नाही. निवडणुकीनंतर बोटावर मोजण्याइतके विरोधक राहतील’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
औरंगजेबाच्या मुद्द्यावरही गिरीश महाजन यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आपल्याकडे लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की ज्याला जे वाटेल त्याने ते बोलावे. भालचंद्र नेमाडे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. पण ते ज्या पद्धतीने उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे. ते हे सगळे प्रसिद्धीसाठी तर करत नाही ना?’, असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.








