अच्युत – सावंत भोसलेंचे प्रतिपादन ; पिकुळे विद्यालयाचा सुवर्णं महोत्सव उत्साहात
दोडामार्ग – वार्ताहर
ध्येय निश्चित केले तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. आपल्या लोकांना आपण काहीतरी दिले पाहिजे या हेतूने मीही भोसले नॉलेज सिटीची स्थापना केली . तुमच्या शाळेला ५० वर्ष झाली असं समजू नका तर इथूनच तुमची सुरुवात झाली आहे असे समजा . तुमचे कार्य हे कौतुकास्पद आहे. असेच कार्य करत रहा व पिकुळे शाळेचे गावाबरोबर जगात नावलौकिक करा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले.
पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई व धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री माध्यमिक विद्यालय पिकुळे च्या ५० व्या सुवर्णं महोत्सव कार्यक्रमा वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सावळाराम गवस, उद्योजक विवेकानंद नाईक, सरपंच सेवा संघटनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष अनिल शेटकर, माजी सभापती दयानंद धाऊस्कर, पिकुळे सरपंच आपा गवस, तीलकांचन गवस, संदीप गवस, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सेजल गवस, माजी मुख्यध्यापक गवस सर व इतर सर्व शिक्षक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई व धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेच्या ५० व्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी ८ वाजता श्री सातेरी केळबाय मंदिरात श्रीफळ ठेवून देवाला गाऱ्हाणे बोलून ढोल ताशांच्या गजरात शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने दिंडी यात्रेला सुरवात करण्यात आली. दशावताराच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांनी श्रीराम प्रभू, हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, श्री विष्णू , देवी सरस्वती यासारखी अनेक वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढविली होती. या दिंडी यात्रेत धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ मिलिंद तोरस्कर, व सचिव रश्मीताई तोरस्कर तसेच पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सावळाराम बापू गवस, सचिव प्रमोद शंकर गवस, खजिनदार रमाकांत गवस, मुख्याध्यापक अशोक अंबुलकर, अनंत धुरी, मोहन गवस, श्रीधर गवस, विलास गवस, विद्याधर धुरी, संदीप गवस, पत्रकार रत्नदीप गवस, सुहास देसाई, आपा गवस, अभिजीत गवस, पिकुळे सरपंच आप्पा गवस, तिलकांचन गवस, दोडामार्ग सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, दीक्षा महालकर तसेच गावातील महिला वर्ग बचतगट, इतर ग्रामस्त मोठ्या संखेने या दिंडी यात्रेत सहभागी झाले होते. मंदिराकडून दिंडी पायी चालत श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पर्यंत आली व दिंडी यात्रेची त्याठिकाणी समाप्ती करण्यात आली. त्यानंतर ११. ०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.०० वाजता विजयानंद नाईक यांचे शास्त्रीय गायन झाले. व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अच्युत सावंत भोसले, उद्योजक विवेकानंद नाईक, पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सावळाराम गवस, सचिव प्रमोद गवस, खजिनदार रमाकांत गवस आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच रात्री ८.०० वाजता दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध कॉमेडी हास्य सम्राट विजय फाले यांची मिमिक्री संपन्न झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. रात्री १०.०० वाजता श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे यांचे उदे ग अंबे उदे हा नाट्यप्रयोग याठिकाणी संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने नाट्य असे का नाही नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा गवस मॅडम यांनी प्रास्तविक मंडळाचे सचिव प्रमोद गवस यांनी तर आभार पूर्वा गवस यांनी मानले.









