राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल : मोदी सरकार नवीन टॅक्स स्लॅब आणण्याच्या तयारीत असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार जीएसटी स्लॅब वाढवण्याच्या तयारीत आहे का? असे संकेत देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी यासंबंधी आरोप करताना केंद्र सरकारकडून ‘भांडवलदारांना सूट आणि सर्वसामान्यांची लूट’ असे धोरण अंगिकारल्याचे म्हटले आहे. एकीकडे कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत प्राप्तिकर सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, मोदी सरकार ‘गब्बर सिंग टॅक्स’मधून जादा वसुली करण्याच्या तयारीत असल्याचेही ते पुढे म्हणाले. राहुल गांधींच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा जीएसटीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जीएसटी दरांच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. जीएसटीमधून सातत्याने वाढणाऱ्या संकलना सरकार नवीन टॅक्स स्लॅब आणणार आहे. याद्वारे सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याची योजना आहे. लग्नाचा मोसम चालू आहे. एकेक पैसा जोडून लोक खर्चाची रक्कम गोळा करत असताना सरकार 1500 रुपयांच्या वरच्या कपड्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करणार आहे. हा घोर अन्याय आहे. धनाढ्यांना करात सवलत देण्यासाठी आणि त्यांची मोठी कर्जे माफ करण्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचा कष्टाचा पैसा करातून लुटला जात आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी चढवला.
आमची लढाई अन्यायाविरुद्ध
सर्वसामान्य जनतेवर कराच्या बोजा टाकण्याच्या विरोधात आम्ही जोरदार आवाज उठवू आणि ही लूट थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणू, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र, ‘सीबीआयसी’ने जीएसटी दरातील बदलाबाबतची शक्यता फेटाळून लावली होती. अलीकडेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जीएसटी दरांमधील बदलाबाबत वाढत्या अटकळांना नकार दिला होता. जीएसटी दरात बदल करण्याबाबत जीएसटी कौन्सिलने अद्याप चर्चा केलेली नाही, असे बोर्डाने म्हटले होते.









