सांगली :
चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीच्या बाबतीतील कागदपत्रे सध्या वन विभागाच्या वतीने वित्त विभागाकडे पाठविल्याची माहीती आ. जयंत पाटील यांनी बैठकीत दिली. पाठबंधारे विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्याबाबत ३४५ प्रकल्पग्रस्तांपैकी १०४ खातेदारांना वाटप पुर्ण झाले आहे. उर्वरित पात्र खातेदारांकरीता निधी मागणी करण्यात आला आहे. अशी माहिती वारणा पाठबंधारे विभागाचे अभियंता नितेश पोतदार यांनी दिली.
या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना जमिन देणे, निर्वाह भत्ता निधी, जमिन प्लॉट वाटप, प्रकल्पग्रस्तांना १ ते ६ शर्ती कमी करुन वर्ग २ मधुन १ करणे, चुकलेल्या ताली व घरे यांचे मूल्यांकन करणे, चुकलेले खातेदार व भुमिहीन प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रे पडताळणी करुन त्यांना यादीत समाविष्ट करणे, खातेदारांना घरबांधणी अनुदान देणे, नागरी सुविधा पुरविणे यांवर चर्चा करण्यात आली. इस्लामपूर शहरातील निनाईनगर वसाहतीतील प्लॉट मोजणी फी शासनाने भरावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, वाळवा तहसीलदार सचिन पाटील, शिराळा तहसीलदार श्यामला खोत, सांगली अप्पर तहसीलदार आश्विनी वरुटे, सविता लष्करे, एस. डी. पाटील, संजय बजाज, खंडेराव जाधव व प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.
- आ. पाटील यांचे अभिनंदन
आ. जयंतराव पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या सुचनेनुसार प्रत्येक गावात पुनर्वसन विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविली गेली व प्रकल्पग्रस्तांना त्याचा फायदा झाला याबद्दल आ. जयंतराव पाटील यांचे विशेष अभिनंदन प्रकल्पग्रस्तांच्या वतीने करण्यात आले.








