लोणावळा : पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करत पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही पवना धरणातून पाणीपुरवठा होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. धरणग्रस्तांनी मोर्चा काढत पवना जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयातून बाहेर काढत कार्यालयाला टाळे ठोकले.
1973 साली पवना धरणाचे काम पूर्ण झाले. हे धरण बांधत असताना साधारणतः 20 ते 25 गावे विस्थापित झाली. 1203 खातेदार यामध्ये विस्थापित झाले असून केवळ 340 जणांचे आत्तापर्यंत पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित 863 खातेदार आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील 50 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक सरकारी आली व गेली. मात्र, कोणीही पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. न्यायालयाने पवना धरणग्रस्तांच्या बाजूने निकाल दिलेला असताना देखील शासनाकडून शेतकऱ्यांना जागावाटप करून दिले जात नाही. मागील अनेक वर्षापासून पवना धरणग्रस्त पुनर्वसनाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने मोर्चे ठिय्या असे प्रकार करत आहेत. मात्र, शासनाला जाग आलेली नाही. केवळ कागदोपत्री खेळ करून शेतकऱ्यांचे आयुष्य धुळीत घालण्याचे काम करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधामध्ये पवना धरणग्रस्त व मावळ तालुक्यातील शेतकरी यांनी एकत्र येत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखून धरला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारीमध्ये तीन शेतकरी शहीद झाली होते. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती आजच्या आंदोलनामध्ये होऊ नये व आंदोलन चिघळू नये याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पवना परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी देखील पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वेळा विधिमंडळात उपस्थित केला आहे.
या आंदोलनात धरणग्रस्तांच्या सोबत मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, ज्ञानेश्वर दळवी, गणेश धानिवले, लक्ष्मण भालेराव, संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, रविकांत रसाळ, मुकुंदराज काऊर, किसन घरदाळे, यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आंदोलक सहभागी झाले होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले.








