गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व पालख्यांचे स्वागत
प्रतिनिधी/ पंढरपूर
गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला, या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱयांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले.
‘उपजोनियां पुढती येऊं, काला खाऊं दही भात, वैकुंठी तो ऐसें नाही, कवळ काही काल्याचे एकमेकां देऊ मुखी सुखी घालू हुंबरी’ या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. ‘पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोला’चा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या छोटय़ा-मोठय़ा दिंडय़ा, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या.
हे ही वाचा : पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून
सकाळी 9.20 च्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर 9.30 च्या सुमारास संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपुरात दाखल झाला. या पालख्या दाखल होताच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱयांनी तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱयांनी पालख्यांचे स्वागत केले.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. मंदिराजवळ पालख्या विसावल्या होत्या. या पालख्यांसह संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे गोपाळपुरात आगमन झाले.
तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठय़ा श्रद्धेने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते.
गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, प्लास्टिक संकलन केंद्र, तात्पुरते शौचालय आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपापल्या परतीच्या मार्गावर रवाना झाल्या. तत्पूर्वी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, ऍड. माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी पादुकांचे पूजन व मानाच्या पालख्यांचे मानकरी यांचे उपरणे, श्रीफळ व हार देऊन सत्कार केला. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.









