विकास कामांसाठी एकाचवेळी निवडणुक आवश्यक; निर्णयाचे जनता स्वागतच करेल
कोल्हापूर प्रतिनिधी
देशात वन नेशन, वन इलेक्शनचीच पद्धत होती. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात उठसुठ राज्य बरखास्त करत हि पद्धत मोडीत काढण्यात आल्याचा आरोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच विकास कामांना गती मिळण्यासाठी एकाचवेळी निवडणुका होणे आवश्यक आहे. केंद्र सरकाराने घेतलेल्या या निर्णयाचे जनता स्वागतच करेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नवीन संकुलाच्या भुमीपुजन प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, देशात वन नेशन वन इलेक्शन अशीच पद्धत होती. मात्र काँग्रेसने सत्ताकाळात वारंवार राज्य सरकारे बरखास्त केली. घटनेत बदल करत केंद्र सरकारला अमर्याद अधिकार दिले. जनतेने निवडणुक दिलेले सरकार बरखास्त करण्याचे अधिकारी केंद्राला मिळाले. यामध्ये वन नेशन वन इलेक्शनची पद्धत मोडीत निघाली. लोकसभा, विधानसभा निवडणुक वेगवेगळ्या झाल्याने आचारसंहिता काळात विकासकामे थांबली जात आहेत. याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकराने हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
जागा वाटपासाठी महायुतीचे त्रिदेव समर्थ
अनेक पक्ष एकत्र येतात तेंव्हा जे उपलब्ध असते ते मागायंच असतं. त्यानुसार राष्ट्रवादीने कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा मागितल्या असतील. सद्दस्थितीत जागा मागितल्या म्हणजे मिळाल्या असे नाही आहे. जागा वाटपासाठी महायुतीचे त्रिदेव समर्थ असून वरीष्ठ पातळीवरच जागा वाटपाचा निर्णय होईल, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची तक्रार जिवंत पणाचे लक्षण
धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे केलेल्या तक्रारीबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, कार्यकर्ते आपल्या नेत्याकडे एखादी तक्रार करतात तेंव्हा ते त्यांच्या जिवंत पणाचे लक्षण असते. मात्र नेत्याने कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर नेत्याने दिलेल्या आदेशानुसार पुढे काम करायचे हे यामधील दूसरे लक्षण असल्याचे, मंत्री पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यामध्ये ते विभागीय बैठका घेणार असून शेवटच्या बूथ प्रमुखापर्यंत संवाद साधणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.








