‘आऊटलुक’तर्फे करण्यात आलेल्या ‘ईएसजी’ म्हणजेच कॉर्पोरेट स्तरावरील त्यांच्या व्यवसायवाढीच्या जोडीलाच पर्यावरण संवर्धन, दीर्घकालीन उपाययोजना व व्यावसायिक कायद्यांची काटेकोर अंमलबजावणीची सद्यस्थिती या नव्या प्रगतीशील मापदंडांची प्रथमच अंमलबजावणीची सद्यस्थिती याची प्रथमच मोजमाप करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरांनुसार एन्व्हायरोनमेंटल, सोशल व गर्व्हनन्स या मुद्यांचा व्यापक अभ्यासासह जो विचार मांडला गेला, या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या आहेत.
या प्रकरणीची पार्श्वभूमी म्हणजे गेली काही वर्षे ‘सेबी’ म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी ‘ईएसजी’ प्रणालीची अंमलबजावणी करण्याबद्दल आग्रही भूमिका घेतली होती. याचाच पुढचा टप्पा म्हणून 2021-2022 या आर्थिक वर्षापासून ‘सेबी’ अंतर्गत प्रमुख व निवडक अशा 1000 कंपन्यांनी त्यांच्या वार्षिक व्यवसाय व आर्थिक अहवालाचाच आवश्यक भाग म्हणून या कंपन्यांद्वारा व्यावसायिक जबाबदारी अंतर्गत दीर्घकालीन उपयांची योजना व त्याची अंमलबजावणी कशी आणि कितपत झाली त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्देशांची त्यानुसार अंमलबजावणी सुरू करण्यात आली हे विशेष.
याच नव्या आणि विशेष निर्देशांच्या अंमलबजावणीचा पडताळा पाहण्याच्या दृष्टीने पहिलाच प्रयत्न म्हणून ‘आउटलुक’ ने व्यवसाय व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या बीडीओ इंडिया या प्रस्थापित कंपनीच्या मार्गदर्शन व सहकार्याने ‘ईएसजी भारत सर्वेक्षण 2023’ करण्यात आले. या नव्या सर्वेक्षणाद्वारे ईएसजीच्या संदर्भात व्यवसाय व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापन आणि व्यवस्थापक यांची तयारी मानसिकता व मुख्य म्हणजे अंमलबजावणीच्या संदर्भातील सद्यस्थितीची पडताळणी करण्याचे काम प्रामुख्याने करण्यात आले. त्यानुसार सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात ‘ईएसजी’सह काम करणाऱ्या निवडक 100 कंपन्यांचा प्रतिसाद जाणून घेण्यात आला. त्यामध्ये या कंपन्यांनी ‘ईएसजी’ संकल्पना व कार्यपद्धतीचा केलेला अवलंब, तयारी, अंमलबजावणी, त्यासंदर्भातील सद्यस्थिती, अडचणी व भविष्यातील योजना इ. चा पडताळा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले गेले.
सर्वेक्षणाला व्यापक व परिणामकारक स्वरुप देण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारच्या उद्योग-कंपन्यांचा आवर्जुन समावेश करण्यात आला हे विशेष. या उद्योगांचा थोडक्यात तपशील सांगायचा म्हणजे त्यामध्ये वित्तीय सेवा संस्था, ऊर्जा व उत्पादन क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग, आरोग्यसेवा, मुलभूत सुविधा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान व संदेशवहन या प्रकारे निश्चित करण्यात आला.
सर्वेक्षण आणि प्रतिसाद अधिक प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी त्यामध्ये संबंधित कंपन्यांचे व्यावसायिक प्रमुख, संस्थापक, मुख्याधिकारी, संचालक, ईएसजी, विभाग प्रमुख वा संबंधित व्यवस्थापकांचा आवर्जुन समावेश करण्यात आला होता. यालाच जोड म्हणून या विषयातील विषयतज्ञ, अभ्यासक व संबंधित मंडळींचा समावेश केल्याने त्याला अधिक संयत व समावेशक स्वरुप देण्यात आले.
यासंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या केवळ 33 टक्के मुख्याधिकारी वा सर्वोच्च व्यवस्थापकांनी त्यांची कंपनी वा उद्योग ‘ईएसजी’ची कार्यपद्धती समजून त्याची अपेक्षित वा परिणामकारक स्वरुपात अंमलबजावणी करण्यासाठी सिद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वेक्षणातील 80 टक्के प्रतिसाद देणाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायवाढीसाठी पर्यावरण संरक्षण संवर्धन ही बाब सर्वात मोठी व महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले आहे. 50 टक्के म्हणजेच निम्म्या व्यवस्थापनांच्यानुसार ईएसजी म्हणजेच एन्व्हायरोनमेंटल, सोशल व गर्व्हनन्स या व्यवसाय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले आहे.
95 टक्के कंपन्यांमध्ये उद्योग व्यवसायाशी संबंधित विविध कायदे व नियम आणि त्यातील तरतुदींचे पालन करणे ही बाब पुढे अधिक महत्त्वाची व जिकिरीची ठरली आहे. त्याचबरोबर या कायदे व नियम पालनावरच या नव्या कार्यपद्धतीचे यश अवलंबून राहणार आहे. तर सुमारे 6 टक्के प्रतिसाद देणाऱ्यांनी कोरोना काळानंतर बरेचसे व्यवसाय, उद्योग आता पुरतेपणी सावरले असून त्यामुळे आता त्यांच्यासाठी ईएसजीची अंमलबजावणी करणे तुलनेने सोपे झाले आहे.
ढोबळमानाने सांगायचे म्हणजे ईएसजी या त्रिसूत्रीमधील पर्यावरण संरक्षण, संवर्धन ही बाब महत्त्वपूर्ण असली ती प्रामुख्याने व मुख्यत: उत्पादन क्षेत्र, ऊर्जा निर्मिती, वाहतूक व्यवसाय, मुलभूत सुविधा, खाणकाम, बांधकाम क्षेत्र आणि या सारख्या व्यवसाय क्षेत्रांशी अधिक निगडित आहे. एवढेच नव्हे तर या नमूद केलेल्या निवडक व विशेष व्यवसाय क्षेत्रांमध्ये परिणामकारक अंमलबजावणी होण्यावरच पर्यावरण विषयक संकल्पनेचे यश प्रामुख्याने अवलंबून राहणार आहे.
व्यवसाय-उद्योग निहाय कंपनी व्यवस्थापनाद्वारे आपापल्या व्यवसायानुरुप व त्याला पूरक स्वरुपात ईएसजी सूत्रांचा प्राधान्यक्रमासह अवलंब करण्यात येत असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. प्रतिसाद देणाऱ्यांच्या मते अधिक प्रगत आणि स्थायी स्वरुपात प्रगतीशील व्यवसाय साधण्यासाठी वरील त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यकच नसून पूरकसुद्धा ठरते. मात्र संबंधित कंपनीच्या व्यवसायानुसार अंमलबजावणीवर भर दिला तर त्याचा व्यवसायातील मूल्यवृद्धीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो ही बाब स्पष्ट झाली आहे.
सर्वेक्षण अभ्यासाद्वारे स्पष्ट झालेली अन्य मुख्य बाब म्हणजे बदलती व्यावसायिक स्थिती, विविध प्रकारची आव्हाने यावर मात करून स्थायी व दूरगामी स्वरुपात यशस्वी होण्यासाठी ईएसजी हा एक सार्थ व समर्थ पर्याय ठरू शकतो. यावर अधिकतर प्रतिसाद देणाऱ्यांचे एकमत झाले आहे. कुठलाही नवा व्यवस्थापन पर्याय हा खर्चिक असतोच. मात्र या वाढीव खर्चावर प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यपद्धती, गुणात्मक दर्जावृद्धी व व्यावसायिक कार्यक्षमता याद्वारा मात केली जाऊ शकते. यालाच पूरक बाब म्हणून अभ्यास सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यवस्थापन प्रमुखांनी व्यवस्थापन पद्धतीचा एक भाग म्हणून ईएसजी पद्धतीवर आधारित विशेष प्रशिक्षणाचे आयोजन-नियोजन सुरू केले आहे. नव्या पद्धतीला हे विशेष प्रशिक्षण पूरक ठरेल असा या मंडळींना विश्वास आहे. अर्थात या नव्या व्यवसाय शैलीसाठी मानवीय पैलूंसह बदलाचे व्यवस्थापन यासारख्या मुद्यांचा समावेश प्रशिक्षणामध्ये करणे अर्थातच महत्त्वाचे ठरणार आहे. आउटलुक-ईएसजी भारत सर्वेक्षणाचा हा तसा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ‘ईएसजी’ वर आधारित व्यवसाय शैली व पद्धतीला मिळणारी वाढती व्यावसायिक मान्यता व उपयुक्तता आता वाढत्या प्रमाणावर दिसून येते. सर्वेक्षणाशी संबंधित अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पर्यावरणाला पसंतीसह प्राधान्य देण्याकडे व्यवस्थापन आणि व्यवस्थापक यांचा कल असला तरी व्यवसायाशी निगडित सर्वच समाज घटक आणि संस्था यांचा सामाजिक संदर्भात विचार करणे व तसेच उद्योग व्यवसायाला लागू होणाऱ्या सर्वच कायदे-नियमांचे पालन व्यावसायिक गरज नव्हे तर व्यवस्थापनाची व्यावसायिक जबाबदारी स्वरुपात पार पाडणे आवश्यक आहे.
दत्तात्रय आंबुलकर








