नागपूर/प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, नागपुरमध्ये देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, असल्याचं ते म्हणाले. तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.
याप्रसंगी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यांनी यावेळी ” सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्यास सांगितलं आहे. पण या सरकारचं एकमेकांशी पटत नाही. पण एका गोष्टीवर यांचा एक सूर आहे, बाकी एकमेकांचे लचके तोडायला ते तयार आहेत, पण सत्तेचे लचके तोडताना एक होत आहे. आणि जिथे हे पडले, धडपडले, जिथे अपयशी ठरले, नापास झाले तिथे एका सूरात बोलतात मोदींनी केलं पाहिजे… मोदींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं, एखाद्या दिवशी यांच्या बायकोने यांना मारलं तर त्यालाही हे मोदींनाच जबाबदार ठरवतील, अशाप्रकारची ही परिस्थिती आहे.
म्हणजे स्वतः काही करायचं नाही. आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदींमुळे झालं, मोदींनी केलं म्हणूनसांगायचं, पण ये पब्लिक है, ये सब जानती है…या जनतेला माहिती आहे. कुणी काय केलं माहिती आहे, असे फडणवीस म्हणले. या देशात ७० वर्षानंतर ओबीसी आयोगाचा संविधानिक दर्जा, हे या देशाचे पंतप्रधान ओबीसीचा पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्या दिवशी पहिल्यांदा संविधानात ओबीसींना जागा मिळाली. काँग्रेस, राष्ट्रवादीने नाही दिली. ओबीसीला या संविधानात आयोगाला जागा मिळाली आणि ओबीसीला संविधानिक करण्याचं काम जर कुणी केलं, असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं.”








