ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा (BJP) यांच्यातही वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी समस्तीपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही काही दिवसांपूर्वी नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडून आरजेडी (RJD) बरोबर युती करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून नितीश कुमार भाजपवर टीका करताना दिसत आहेत.
दरम्यान, नितीश कुमार यांनी शुक्रवारी समस्तीपूरमधील येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ‘इथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नाही. सध्या आपण जिथे आहोत तिथेच एकत्र राहून, बिहार आणि देशाची प्रगती करू’ असे नितीश कुमार यांनी म्हटले.
२०१७ पूर्वी नितीश कुमार यांनी मिट्टी में मिल जाएंगे लेकिन बीजेपी के साथ नहीं जाएंगे असं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नसल्याचे वकव्य केलं आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत लालू प्रसाद यादव यांच्यासोबत घरोबा केला आहे. भाजपशी असणारी युती तोडून त्यांनी पुन्हा महाआघाडीसोबत सरकार स्थापन केलं.
केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची चिंता नाही
आजकाल भाजपचे लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. अटलबिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत की मुरली मनोहर जोशी या सर्वांनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. पण आज जे केंद्रात बसले आहेत त्यांना विकासाचे काहीच देणं घेणं नसल्याची टीका नितीश कुमार यांनी भाजपवर केली. बिहारमधील अभियांत्रिकी महाविद्यालय पाटणा ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. 1998 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटलबिहारी बाजपेयींनी मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले. त्यावेळी केंद्र सरकारने तीन विभागांची जबाबदारी सोपवली होती. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी खूप काम केले, पण आज केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची कोणतीही चिंता राहिली नसल्याचे नितीश कुमार म्हणाले.









