केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन : ‘केएलई’ अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ थाटात
बेळगाव : देशातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नवोदित डॉक्टरांनी शिक्षणाचा अभिमान बाळगावा, त्याचा आदर करावा आणि या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाची प्रामुख्याने जेरियाट्रिक व मानसिक आरोग्य क्षेत्रात संशोधनाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य सेवेमध्ये बदल घडवून आणावा, अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन व खत विभागाचे मंत्री जगत्प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केली. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (अभिमत विद्यापीठ) चा पंधरावा पदवीदान समारंभ जेएनएमसीच्या शताब्दी सभागृहात शानदारपणे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा खाते तसेच पुनऊ&र्जा खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे व डॉ. शैलेश श्रीखंडे उपस्थित होते. यावेळी जे. पी. नड्डा म्हणाले, आरोग्य क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक बदल करण्यात आले आहेत. नवोदित डॉक्टरांनी हे बदल जाणून आपले आरोग्य धोरण समजून घ्यायला हवे. एक काळ असा होता की, भारतात शिकून डॉक्टरांसह अनेकजण परदेशात स्थायिक होत. आज भारतीय डॉक्टर केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर आरोग्य सेवा देण्याइतके सक्षम झाले आहेत.
आरोग्याच्या धोरणात बदल करून 2017 मध्ये आपण होलियॅस्टिक आरोग्यावर भर दिला. आयुष्मान भारत योजना सुरू केली. कोट्यावधी लोकांची मधुमेह, बीपी, कॅन्सर आदी तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळीच प्राथमिक स्तरावरच आरोग्याची तपासणी केली गेली तर मधुमेह, रक्तदाब यांचे प्रमाण कमी होईल. आज पोलिओ, कुष्ठरोग यांचे निर्मूलन झाले आहे. प्रसूतीवेळी माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आंतरशाखीय औषधोपचार पद्धतीवर आपण भर दिला आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक औषध पद्धत यांचा समन्वय साधून नवसंकल्पनांवर भर द्या, वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सहभाग वाढवा, शिकण्याची प्रक्रिया निरंतर असते. त्यामुळे कोणीही ज्ञान दिले तर त्याचा आदर करा, असे आवाहन जे. पी. नड्डा यांनी केले. भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या देशात 18 ते 35 वयोगटातील 16 कोटी लोक आहेत. अलीकडच्या काळात डॉक्टरांची संख्या वाढत असून यापुढे भारतच जगाला उत्तम डॉक्टर उपलब्ध करून देईल, यात शंका नाही. त्यामुळे पदवीप्राप्त नवोदित डॉक्टरांनी समाज, कुटुंब व देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून भारताला महासत्ता करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, आपल्या आरोग्य सेवेमध्ये पारदर्शकता येत आहे. सेवा क्षेत्रामध्ये आपण प्रगतिपथावर आहोत. परंतु उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती करायला हवी. त्यामुळे आपल्याला उत्तम डॉक्टर, शिक्षक, तंत्रज्ञ, नर्स, इंजिनियर्स, मेकॅनिक्स यांची गरज आहे. आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळामुळे भारताला विविध क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याचा लाभ घेऊन आपण ‘समर्थ भारताची उभारणी’ करायला हवी. या समारंभात एकूण 1844 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. 40 जणांना पीएचडी, 29 जणांना पोस्ट डॉक्टरल, 660 पीजी, 680 यूजी, 9 पीजी डिप्लोमा, 4 फेलोशिप्स व 11 सर्टिफिकेट कोर्स यांचा समावेश आहे. 35 जणांना सुवर्णपदक देण्यात आले. त्यापैकी 28 मुली सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. या सर्वांची नावे त्या शाखेच्या डीनने वाचून दाखविली. परीक्षा नियंत्रक चंद्रा मेटगुडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. कोरे यांनी पाहुण्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला. कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. नेहा धडेद व डॉ. अविनाश कवी यांनी केले.
स्त्राrरोग तज्ञ होणार : डॉ. श्वेता गोरे
या पुढील काळात आयुर्वेद शास्त्राला महत्त्व येणार आहे. आपली पारंपरिक औषध पद्धत अतिशय परिणामकारक असून त्याची माहिती समाजात पोहोचविण्याची गरज आहे. मी आयुर्वेद अभ्यासक्रम निवडला असून मला स्त्री रोग व प्रसूती तज्ञ होण्याची इच्छा आहे, असे केएलई आयुर्वेदिक कॉलेजच्या चार सुवर्णपदकांची मानकरी डॉ. श्वेता गोरे हिने सांगितले. ‘तरुण भारत’शी बोलताना ती म्हणाली, मी मूळची अक्कलकोटची आहे. तेथील केएलईच्या शाळेतच माझे शालेय शिक्षण झाले. हुबळी येथील केएलईच्या प्रेरणा कॉलेजमधून पीयूसी झाल्यानंतर मला बेळगावच्या कंकणवाडी आयुर्वेद कॉलेजमध्ये मेरिट सिट मिळाली. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न होते. आज त्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. आयुर्वेद ही महत्त्वाची शाखा असून ती गुणकारी आहे, असेही ती म्हणाली. तिच्या सोबत वडील राजशेखर, आई श्रीदेवी, बहीण श्रुती व भाऊ राकेश उपस्थित होते.
काँग्रेस सरकारला टोला
पंतप्रधान मोदी यांचे सरकार आरोग्य सेवेमध्ये पारदर्शकता आणून सर्व सामान्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे. काही राज्यांतील सरकारे सर्वसामान्य व गरिबांसाठी असणारी जनौषधी केंद्रे बंद करत आहेत हे दुर्दैवी आहे, असा टोला प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा उल्लेख न करता लगावला.
मंत्री नड्डांकडून दिलगिरी
काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांनी दहा वर्षांपूर्वी मला बेळगावला येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु मला येणे जमले नाही. आज केएलई व काहेर संस्था आणि त्यांची प्रगती पाहून आपण येण्यास उशीर केला. याबद्दल मी कोरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो, असे जे. पी. नड्डा म्हणाले.









