कोल्हापूर : प्रतिनिधी
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सध्या नवरात्र उत्सव साजरी होत आहे आणि दरवर्षी नवरात्र उत्सवात श्री आई अंबाबाई नऊ दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शनासाठी येत असते दरम्यान आज नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी आई अंबाबाई कूष्मांडा देवीच्या रुपात भक्तांच्या भेटीला आली आहे. मूर्ती अत्यंत सुंदर दिसत असून आईचे भक्त हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2023 शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई कूष्मांडा देवीच्या रूपामध्ये सजलेली आहे.श्री दुर्गासप्तशती अंतर्गत श्री ब्रह्मदेव आणि श्री मार्कडेयऋषी यांच्या मधील संवादाप्रमाणे सर्वांचे रक्षण करण्यास समर्थ असे जे देवी कवच आहे. त्यानुसार देवी नऊ नांवांनी प्रसिद्ध आहे. ही नऊ नांवे म्हणजेच नवदुर्गा ह्या नवदुर्गा अनुक्रमे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री होत. श्री दुर्गमातेच्या चौथ्या रुपाचे नांव कूष्मांडा आहे. तिने आपल्या मंद, प्रसन्न हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केले.
ज्यावेळी ब्रह्मांडाचे अस्तित्व नव्हते, सर्वत्र अंधःकार होता तेंव्हा आपल्या ईश्वरी हास्यातून तिने ब्रह्मांडाची रचना केली. अर्थातच हीच ब्रह्मांडाची आदिशक्ती आहे. हिचा निवास सूर्यलोकांत आहे. सूर्यलोकात निवास करण्याची क्षमता आणि सामर्थ्य केवळ हिच्यातच आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासाखी तेजस्वी, दैदीप्यमान आहे आणि यांची बरोबरी कोणताही देव किंवा देवी करू शकत नाही. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दाही दिशा प्रकाशित होत आहेत. ब्रम्हांडातील सर्व सजीवांत आणि निर्जीवांत तिचेच तेज आणि चैतन्य भरून राहिलेले आहे.
श्री कुष्मांडा देवी ही अष्टभुजादेवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातामध्ये सर्व सिद्धि आणि धनसंपत्ती देणारी जपमाळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. संस्कृत भाषेत कोहळ्याला कूष्मांड असे म्हणतात. कूष्मांड तिला विशेष आवडतो म्हणूनच नवचंडी, शतचंडी इ. होमहवनांत कोहळ्याचे समर्पण असते. त्यामुळेच तिला कूष्मांडा म्हणतात.
नवरात्राच्या चतुर्थीला कूष्मांडादेवीची उपासना केली जाते. यादिवशी साधकाचे मन अनाहत चक्रामध्ये स्थिर झालेले असते. त्यामुळे यादिवशी तिचे रूप लक्षात ठेवून अत्यंत पवित्र व स्थिर मनाने कुष्मांडादेवीची पूजा व उपासना केली पाहिजे. तिच्या उपासनेने भक्तांचे सर्व रोग, शोक नष्ट होतात. तिच्या भक्तीने आयुष्य, यश, वळ आणि आरोग्य यांची वृद्धी होते. कुष्मांडादेवी अत्यल्प सेवा आणि भक्तीने प्रसन्न होणारी आहे. मनुष्य जर प्रामाणिक अंतःकरणाने तिला शरण गेला तर त्याला सहज परम पदाची प्राप्ती होवू शकते.
श्री कूष्मांडा उपासकाला अल्प काळातच तिच्या कृपेचे सूक्ष्म अनुभव येवू लागतात. या भवसागरातून पार होण्यासाठी तिची उपासना हा सर्वाधिक श्रेयस्कर मार्ग आहे. त्याचबरोबर मनुष्य त्या उपासनेद्वारे आधिव्याधिमुक्त होवून सुखसमृद्धी आणि उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतो. याप्रमाणे आपल्या ऐहिक आणि पारमार्थिक उन्नतीसाठी तिच्या उपासनेमध्ये सदैव तत्पर राहिले पाहिजे.









