यावर्षी गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करण्यात येणार आहे
कोल्हापूर : भाविकांना देवीचे दर्शन सुलभ होईल, या अनुषंगाने सर्व व्यवस्था प. महाराष्ट्र देवस्थान समिती, महापालिकेमार्फत केली आहे. अंबाबाईचा नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
देशभरातून येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन निर्विघ्नपणे होण्यासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचावासाठीची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसरात भेटी दरम्यान दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांना देवीचे दर्शन विना अडथळा व्हावे, यासाठी काही ठिकाणी प्लायवूडसुद्धा लावण्यात येत आहेत. यावर्षी गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करण्यात येणार आहे. कंट्रोल रुमचे काम अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक अतिक्रमण काढण्याचे काम महानगरपालिकेमार्फत केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दीच्या अनुषंगाने आवश्यक काही स्टॉलही दहा दिवसांसाठी हटवण्यात येणार आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी मंदिर बाह्य परिसर, दर्शन रांगा, मनकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या.
वाहनतळ ते मंदिर परिसर भाविकांसाठी केएमटीमार्फत एसी व इतर बसची व्यवस्था केलेली आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला आणि अंतर्गत वाहनतळांची निवड केली आहे.
येथून भाविकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे मंदिर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर येता येणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी वाहन तळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्dया 15 ठिकाणी वाहनतळ, 64 स्वच्छतागृहे व मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.








