ओटवणे प्रतिनिधी
शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खते, किटकनाशके यांचा होणारा बेसुमार वापर कमी करावा. उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होते तसेच आरोग्याच्या दृष्टीने घातक अशा आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिने नैसर्गिक शेती लाभदायक असून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्विकार करावा असे आवाहन बांदा मंडळ कृषी अधिकारी वाय. जे. भुईंबर यांनी केले.कोनशी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जनजागृती कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वाय. जे. भुईंबर बोलत होते. यावेळी कोनशी सरपंच साधना शेटये, तालुका तंत्र अधिकारी प्रकाश पाटील, कृषी पर्यवेक्षक मनाली परब, आत्मा बी. टी. एम् मिनल परब, कृषी सहाय्यक पूनम देसाई, ग्रामसेवक श्री ठाकुर उपस्थित होते.यावेळी तालुका तंत्र अधिकारी प्रकाश पाटील यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सखोल मार्गदर्शन केले. आत्मा बीटीएम मिनल परब यांनी नैसर्गिक शेती शाश्वत शेती असल्याचे सांगून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जागृतीबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोनशी सरपंच साधना शेटये यांच्याहस्ते करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक शेती हे वरदान असून सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन मिळावे तसेच नैसर्गिक शेतीची जाणीव आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोनशी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनाली परब तर आभार पुनम देसाई यांनी मानले.









